सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
by जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग
Page 17 of 611
Read in contextतेत्रीस .
संसाराच्या उदासीनतेमुळे तुकोबांचे लक्ष विठ्ठलाकडे वळले हे खरेच आहे. संसारातील व व्यवसायातील आपत्तीमुळे तुकोबांना एकान्ताचा वास रुचला, हेही खरे. घरी दारी त्याची विटंबना होत राहिली म्हणून त्यांचे चित्त विठ्ठलपायी दृढ झाले हे खरेच. पण या बाबतीत आणखी सूक्ष्म विचार व्हावयास हवा. प्रसंगी तुकारामबुवांनी वैतागाचे, दुःखाचे उद्गार काढले आहेत. कर्कशा असणाऱ्या बाईलीचे त्यांनी आभार मानले आहेत; दुकानाचे दिवाळे निघाले, बरे झाले, असेही त्यांनी म्हटले आहे. पण केवळ या सांसारिक व व्यावसायिक आपत्तीमुळेच तुकोबा श्रेष्ठ पदवीस चढले, असे मानणे बरोबर होणार नाही. संसारातील आपत्ती सर्वांनाच असतात; व्यवसायातील चढउतारही सर्वांनाच भोगावे लागतात. वांझाड बायको पुष्कळांच्या नशिबी असते. पण या अवस्थेत प्रत्येक ठिकाणी तुकोबा निर्माण होत नाहीत. 'संसाराच्या तापें तापलों मी देवा' येथपासून 'तुका झाला पाडुरंग' येथपर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे, त्याचा अधिक बारकाईने विचार व्हावयास हवा. तुकोबांच्या मनाची वृत्ती, त्यांची घरची परंपरा, घराण्यातील विठ्ठलाचे अनुसंधान, त्यांची साधना, त्यांचे नामसंकीर्तन, त्यांचा एकान्तवास, त्यांची पूर्व- पुण्याई, ज्ञानेश्वरनामदेवांशी त्यांचे जडलेले नाते, या सर्वांचा परिपाक म्हणजे तुकाराम महाराजांचे दिव्य असे पारमार्थिक जीवन होय. सांसारिक दुःखे व व्यावसायिक अपयश हे वरवरचे एक निमित्त होय.
अभंगवाणीचे अंतरंग
यान पार्श्वभूमीवरून महाराजांच्या अभंगवाणीचे अंतरंग पाहावयास हवे. त्यांच्या दिव्य अभंगवाणीच्या गाभाऱ्याचे दर्शन, हा आजही एक अलौकिक व चैतन्याने रसरसलेला अनुभव आहे. त्याच्या सजीव दर्शनाने आजही माणसाचे डोळे पाणावतात, हृदय भरून येतं, सात्त्विकतेने चित्त प्रका- शित होते, भगवंताच्या रूपसौंदर्याने डोळे दिपून जातात; त्याच्या वत्सलतेने व भक्ताच्या आर्ततेने अभंग वाचणाऱ्याच्या चित्तावरही तेच संस्कार उमटतात. तुकोबांनी जे पाहिले, जे भोगले, त्याचा जसाच्या तसा ठसा त्यांच्या अभंगवाणीवर उमटलेला असल्यामुळे वाचकासही ती अनुभूती सहजासहजी ध्यानात येऊ शकते. सोपे सोपे शब्द व प्रसादपूर्ण अशी रचना या गुणांमुळे बुवांचे कित्येक अभंग आजही हृद- याचा ठाव घेऊन जातात. तुकारामबुवांच्या भावविश्वाचे या मनोगभाऱ्याचे अलौकिक दर्शन आजही अनेकांच्या चित्तवृत्ती उल्हसित करील असेच आहे.