भारतकोश
छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

पृष्ठ 72, कुल 127 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 72

९. मुघलांची पिछेहाट रयतेला कौल आग्र्याहून परत आल्यानंतर शिवाजीने प्रथम आपल्या जवळच्या शत्रूंना सामोपचाराने आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न केला. मागील प्रकरणात सांगितल्याप्रमाणे आदिलशहा आणि कुतुबशहा यांनी शिवाजीबरोबर तह करून सलोखा जोडला होता. बारदेशच्या स्वारीनंतर पोर्तुगीजही नरमले होते. त्यांनी शिवाजीला आशिया खंडातील श्रेष्ठ राजा मानून त्याच्याशी सलोख्याचा तह केला. इंग्रज, डच, आणि फ्रेंच यांनी तर नरमाईचेच धोरण स्वीकारले होते. फक्त मुघलांचा शिवाजीला प्रखर विरोध होता. तरीपण आग्र्याहून सुटून शिवाजी दक्षिणेत आल्यानंतर औरंगजेबाने शिवाजीशी वरकरणी सलोखा प्रस्थापित केला. शाहजादा मुअज्जम हा इ.स. १६६७च्या प्रारंभी दक्षिणेचा सुभेदार म्हणून औरंगाबादेस रूजू झाला. तो ऐषारामी प्रवृत्तीचा होता. आणि मराठ्यांबरोबर त्याला संघर्षही नको होता. एकूण शिवाजीच्या दृष्टीने इ.स. १६६७-६८ हे वर्ष बऱ्याच प्रमाणात शांततेचे गेले. सतत लढाया आणि पेचप्रसंग सुरू असल्यामुळे स्वराज्यात सुधारणा करण्याइतकी सवड शिवाजीला मिळाली नव्हती. विशेषतः शायिस्तेखानाच्या स्वारीनंतर आणि त्यानंतर जयसिंग- दिलेरखान यांच्या स्वारीमुळे स्वराज्यातील बराच मुलूख उध्वस्त झाला होता. शेतकऱ्यांची परिस्थिती दयनीय झाली होती. मुघलांनी काही गावेच्या गावे जाळून-पोळून भस्म केल्यामुळे लोक परागंदा झाले होते. गावेच्या गावे ओस पडली होती. लोकांची परिस्थिती शोचनीय झाल्यामुळे महसूलाचे उत्पन्न खूप घटले होते. अशाप्रकारे स्वराज्यामध्ये बिकट संकट निर्माण झाले होते. आपल्या स्वराज्याचा विस्तार करण्यापूर्वी आपल्या ताब्यात असलेल्या राज्याची घडी बसविणे, रयतेला कौल देऊन त्यांचे पुनर्वसन करणे आणि स्वराज्याच्या परिसरात शांतता निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे याची शिवाजीला पूर्ण कल्पना होती. परंतु जयसिंगच्या स्वारीनंतर मुघलांशी राजकारण करण्यामुळे शिवाजीला स्वराज्यामध्ये सुधारणा करण्यासाठी अवसर सापडला नाही. आग्र्याहून परतल्यानंतर १६६७ च्या अखेरपर्यंत बरेच स्थीरस्थावर झाले आणि शिवाजीला स्वराज्यात सुधारणा करण्यासाठी उसंत मिळाली. ६६