भारतकोश
सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)

Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary

जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा

DevanagariMarathipublished611 पृष्ठ

पृष्ठ 100, कुल 611 में से

संदर्भ में पढ़ें
पृष्ठ 100

एकमेकांना मार्ग दाखविले व आपण मात्र प्रपंचबुद्धीतच गुंतून राहिले. वरवरच्या माळात व फुलांत चित्त गुंतवून त्याचा नाश केला. यांना आपले पदरचे खर्च करून द्यावे हे पसंत नसते. दुसऱ्याचे आयते खावेसे वाटते. अशी माणसे जन्ममरणाच्या चक्रात सापडून, भार वाहता वाहताच मरण पावतात. ५ दुसरी काही माणसे मायेच्या खटाटोपात सापडून देह बुद्धीच्या घरात अडकतात. आपली स्वतःची अशी काहीच वार्ता त्यांना माहीत नसते. ते पूर्वजन्मीच्या क्रियेचे साठलेले जुनेपाके व शिळे फळ असेल तेच त्यांना खावे लागते. अशा परिस्थितीत, पाहता पाहता त्यांचे आयुष्य संपते व मग ते सावध होतात. ६ कित्येकांनी तर हातापायांना व अंगाला राखेचे पट्टे लावून गोसाव्याचे रूप धारण केले. दुसऱ्या काहींनी आपले डोके सोलून, भुंडून शेंडी नाहीशी केली, संन्याशाचे सोंग घेतले. आणखी कित्येकांनी आळसात राहून दाढीजटा व केस वाढविले, पण शुद्ध पुण्याच्या शिदोरीशिवाय त्यांच्या सर्व क्रिया व त्यांची बुद्धी याचा नाशच झाला. ७ तुकाराम महाराज म्हणतात, आता श्रीकृष्ण, या आमच्या शिदोऱ्या तूच आम्हास वाटून दे. आमच्यापाशी काय आहे नाही ते तुला सर्व काही माहीत आहेच. तूच जर आम्हास सोडलेस तर मग आम्ही शरण कोणास जावे? कृपावंत परमेश्वराने एकदा कृपा केली की मग पोटभर भोजन सुखाने करता येते. ८ १४५ बैसवूनि फेरीं । गडिया मध्यभागीं हरी ॥ अवघियांचे करी । समाधान सारिखें ॥ १ ॥ पाहे तो देसे समोर । भोगी अवघे प्रकार ॥ हरुषें झेली कर । कवळ मुखीं देती ते ॥ २ ॥ बोले बोलतिया सवें । देतील तें त्याचें घ्यावे ॥ एक एका ठावे । येर येरा अदृश्य ॥ ३ ॥ कोणाचिया जीवां । वाटो नेदीं विषम ॥ तुका म्हणे हेवा । बहु आवडीचा हेवा ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - फेरी-ओळ, कवळ-घास, विषम-दुःख. अर्थ - श्रीकृष्ण सर्वांना आपल्या भोवती ओळ करून बसवितो व आपण सर्वांचे समाधान करून सर्वांना सारखेच वागवितो. १ प्रत्येकास तो आपल्या समोरच आहे असे भासले व सर्व प्रकारचे भोग ते भोगू लागले. मोठ्या आनंदाने हातात व मुखात श्रीकृष्ण घास झेलू लागला. २ जे स्वतःशी बोलतील त्यांच्याशी तो मनापासून बोलू लागला, जे देतील ते तो घेऊ लागला. त्यांच्या या कृत्यांतील अर्थ त्यांचा त्यालाच माहीत असावा. त्यांच्‍यात ते गुप्त होते. ३ तुकाराम महाराज म्हणतात, ईश्वराला भक्तांच्या प्रीतीची हाव मोठीच आहे. तो कुणाच्याही मनाला दुःख होईल असे कधी करीत नाही. ४ १४६ आम्हा निकट वासे । कळों आलें जैसे तैसे ॥ नाहीं अनारीसें । कान्होबाचे अंतरों ॥ १ ॥ पीडती आपुल्या भावना । जैसी जयाची वासना ॥ कर्माचा देखणा । पाहे लीळा कौतुक ॥ २ ॥ खेळ खेळे न पडे टाई । ज्याचा भार त्याच्या ठायीं ॥ कोणी पडतील डाईं । कोणी फोडो उगविती ॥ ३ ॥ तुका म्हणे कवळ । हातीं घेऊनि गोपाळ ॥ देतो ज्याचे बळ । त्यासि तैसा विभाग ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अनारीसे-वेगळे, टाई-डावात, कवळ-घास.

सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ) · पृष्ठ 100, कुल 611 में से · BharatKosha