सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 254, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें२१८ | सार्थ तुकारामगाथा
विवरण :- वरील दोन व पुढील चार अभंगांतून वासुदेवाच्या भूमिकेवरून तुकोबांनी सर्वसामान्य जनतेस रूपकाच्या भाषेत बोध केला आहे. तुकारामासारख्या अनेक मराठी संतांनी सांस्कृतिक उद्बोधनाचे, धर्मप्रसाराचे व रक्षणाचे, जनतेस सन्मार्ग दाखविण्याचे फार मोठे कार्य केले आहे. पारमार्थिक तत्त्वज्ञान, वेदान्तविचार, आध्यात्मिक अनुभूती याचा त्यांनी स्वतः अनुभव घेतला व तो इतरांसाठी अतिशय सुलभ भाषेत भाष्याच्या आधारे शब्दबद्ध केला. रामकृष्णकथा, कौरवपांडवांच्या कथा सांगून आबालवृद्धांना थोर परंपरेची ओळख त्यांनी वारंवार करून दिली. मराठी संतांचे हे पारमार्थिक विचारधन प्रत्येकाच्या घरी नेऊन पोचते करण्याचे महान कार्य मनोरंजनाच्या द्वारे करणारा एक मोठा वर्ग त्यावेळी समाजात होता. त्यावेळी मुद्रणकलेचा शोध आपल्या देशात आलेला नसल्याने, पुस्तके मुद्रित स्वरूपात नव्हती, शिक्षणाचा प्रसार नव्हता, विद्यालये नव्हती अशा काळात बहुजनास परमार्थप्रवण करून बहुश्रुत करण्याचे कार्य साधुसंतांनी केलेच, पण त्यांच्या कार्याचा फार मोठा विस्तार मनोरंजनाच्या द्वारे खेड्यापाड्यातही घरोघरी जाऊन करणारा एक मोठा सन्मिश्र वर्ग होता. हा वर्ग म्हणजे गोंधळी, भुत्ये, वासुदेव, वाघ्या-मुरळी, नंदीबैलवाल इत्यादींचा होय. अजूनही यांच्यापैकी काहीजण रस्त्यातून दिसतात. आज नाही उद्या या मंडळींचे भवितव्य काय होणार आहे ? कुणास माहीत ? पण आज भिकाऱ्याप्रमाणे वाटणारे लोक एके काळी सांस्कृतिक उद्बोधनाचे व प्रसाराचे कार्य फार चांगल्या प्रकारे करीत असत. महाराष्ट्राच्या समाजजीवनाचे हे एक प्रधान अंग होते. निरक्षर असणाऱ्या, अज्ञानामध्ये जीवन कंठणाऱ्या, व आपली शेती आणि खैडे सोडून न जाणाऱ्या शेतकरीवर्गास त्याच्या घरी जाऊन त्यास त्याच्या देवदेवतांची आठवण करून देणे, रोजची तिथी, रोजचे नक्षत्र, रोजचा सण याची आठवण करून देणे हे महत्त्वाचे कार्य लोकरंजनाच्या साहाय्याने गोंधळी, भुत्या, वासुदेव, कानफाट योगी, वाघ्या-मुरळी, बाळसंतोष, सरोदा ( पिंगळा ), कुडमुड्या जोशी, काल्हाटी, डाकारी, फकीर, जांगडे, भाटो, बहुरूपी, कडवलक्ष्मी, वैदू इत्यादी अनेक प्रकारच्या लोकांनी केले आहे. यांच्या परमार्थनिरूपणास विनोदाची, अतिशयोक्तीची, उपरोधाची किनार असल्यामुळे याची सोबत समाजास उपकारक वाटली.
या काही व पुढल्या तीनचार अभंगांत तुकारामबुवांनी वासुदेवाच्या भूमिकेवरून परमार्थनिरूपण केलेले आहे. वासुदेवाची जमात द्वारकेपासून आली असावी. हे मोठे कृष्णभक्त असून आजही त्यांच्या चिपळ्या, त्याचा टाळ, त्याचा पावा सकाळच्या वेळी श्रीकृष्णगीतातून साथ देणाऱ्या या गोष्टी आहेत. श्रीकृष्ण किंवा विठ्ठल यांची उपासना हे लोक करतात. याचा वेष बालकृष्णाचा असतो. डोक्यावर मयूरपिसांची टोपी असते, पायांत घुंगुर असतात तोंडांनी अलगुज असते. जुन्या पद्धतीचा पायघोळ अंगरखा असतो. त्यावर तांबडे अळवण असते. कृष्णभक्तीची गाणी गाऊन हे सकाळच्या प्रहरी लोकांना सुखवीत असत. या वासुदेवावर ज्ञानेश्वरएकनाथादी संतांनीही अभंग रचना केलेली आहे. 'घुळघुळा वाजती टाळ । झणझणा नाव रसाळ' या चरणाचा ज्ञानदेवांचा एक नादमधुर अभंग वासुदेवावर आहे. 'वासुदेव स्मरणे तुटती जन्ममरण व्याधी । अहू सोहं कोहं मूळ या सांडी उपाधी' अशा भाषेत एकनाथांनी वासुदेवाचे माहात्म्य सांगितले आहे.
४३१ गेले टळले पाहार तीन । काय निदसुरा असून । जागे होउनि करा कांहीं दान । नका ऐकोनि १ झांको लोचन गा ॥ १ ॥ हरी राम कृष्ण वासुदेवा । जाणवितसे जना । चिपळ्या टाळ हातीं मुखीं घोष । नारायणा २ गा ॥ २ ॥ जें टाकेल कोणा कांहीं । फळ पुष्प अथवा तोय । द्या परी भीस घेऊं नका भाई । पुढें विन्मुख होतां बरें नाहीं गा ॥ ३ ॥ देवाकारणे भाव तस्मात । द्याये न लगे फारसे वित्त । जाले एक चित्त तरी बहुत । तेवढ्यासाठीं नका करूं वाताहात गा ॥ ४ ॥
१ ऐको झाकोनि, २ नामनारायणा गा