सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 458, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४२० सार्थ तुकारामगाथा ९१६ आपुल्या विचार करीन जीवांशीं । काय या जनांशीं चाड मज ॥ १ ॥ आपुलें स्वहित जाणती सकळें । निरोधितां बळें दुःख वाटे ॥ २ ॥ आइको नाइको कथा कोणी तरी । जाऊनियां घरीं निजो सुखें ॥ ३ ॥ माझी कोण वोज जाला हा शेवट । देखोनियां वाट आणिकां लावूं ॥ ४ ॥ तुका म्हणे भाकूं आपुली करुणा । जयाची वासना तया फळे ॥ ५ ॥ शब्दार्थ व टीपा :- चाड-किंमत, वोज-चांगला. अर्थ :- परमार्थासंबंधीचा विचार मी माझ्या जीवाला विचारूनच करीन. इतर लोकांची किंमत मला काय असणार ? त्यांचा संबंध काय ? १ जो तो आपले हित नीटपणे जाणीत असतोच; त्यांना त्यांच्या कर्मापासून निरोधित केले तर दुःखच होणार. २ माझी ही कथा कोणी ऐको वा न ऐको, किंवा कोणी आपल्या घरी सुखाने झोपी जावोत. ३ माझा तरी या मार्गात असा कोणता चांगला शेवट झाला आहे की, ज्याच्यामुळे मी इतरांना मार्गाला लावावे ? ४ तुकाराम महाराज म्हणतात, मी स्वतःपुरती त्या ईश्वराची करुणा भाकेन. ज्याची जशी वासना तसा तो त्यास प्रसन्न होईल. तशी त्याची वासना फळद्रूप होईल. ५ ९१७ धाईं अंतरिच्या सुखें । काय बडबड वाचा मुखें ॥ १ ॥ विधिनिषेध उर फोडी । जंव नाहीं अनुभवगोडी ॥ २ ॥ वाढे तळमळ उभयता । नाहीं देखिलें अनुभवितां ॥ ३ ॥ अपुल्या मतें पिसें । परि तें आहे जैसेंतैसें ॥ ४ ॥ साधनाची सिद्धि । मौन करा स्थिर बुद्धि ॥ ५ ॥ तुका म्हणे वादें । वांयां गेलीं ब्रह्मवृंदें ॥ ६ ॥ शब्दार्थ व टीपा - धाईं-संतुष्ट, ब्रह्मवृंदें-ब्राह्मणांचे मेळावे. अर्थ :- अंतःकरणातील परमेश्वररूपाच्या दर्शनाने जे सुख होईल ते ध्यानात धरून संतुष्ट व्हावे. मुखाने उगाच बडबड कशास करावी ? १ परमेश्वराच्या विषयांची अनुभवाची गोडी जोपर्यंत लाभलेली नाही, तोपर्यंत विधिनिषेधांची शुष्क चर्चा नुसती उर फोडणारी व्यर्थच होते. २ जोपर्यंत ईश्वरविषयक अनुभव आलेला नाही, तोपर्यंत हृदयातील तळमळ मात्र वाढत असते. ३ कित्येक जण आपल्याच विशिष्ट मताने येडावलेले असून त्यांचा त्यायोगे काहीही फायदा झालेला नाही. ते जिथे आहेत, तिथेच दिसतात. त्यांच्यांत कसलीही प्रगती झालेली नाही. ४ तुम्ही मौन धारण करून बुद्धी स्थिर करा. हीच खरी म्हणजे सर्व साधनांची सिद्धी आहे. ५ तुकाराम महाराज म्हणतात, परंतु व्यर्थ वादविवाद करकरून हे ब्राह्मणांचे समुदाय किंवा मेळावे उगाच वाया मात्र गेलेले दिसतात. ६ ९१८ कुशळ गुंतले निषेधा । वादी प्रवर्तले वादा ॥ १ ॥ कैसी ठकलीं बापुडीं । दंभविषयांचे सांकडीं ॥ २ ॥ भुस उपणुनि केलें काय । हारपले दोन्ही ठाय ॥ ३ ॥ तुका म्हणे लागे हातां । काय मथिलें घुसळितां ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा :- कुशळ-कुशल, सांकडीं-संकटात, उपणुनि-पाखडून, मथिलें-पुसलेले असता. अर्थ :- जे शास्त्रांमध्ये कुशल आहेत, त्यांचे सारे आयुष्य विधिनिषेधांच्या जंजाळातच जाते व ज्यांची बुद्धी प्रगल्भ आहे, ते नेहमीच वाद करण्यास प्रवृत्त झालेले असतात. १ ढोंग किंवा दंभ व विषयांची संकटे यांत हे दीन बापडे लोक कसे फसून गेले आहेत पाहा. २ भुसा पाखडून काय हाती लागणार ? दाणेही जातील व भुसही हातचा जाईल. ३ आधीच लोणी काढून घेतले असताना मग ताक घुसळले असता काय हातात येणार ? ४