सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 5, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ेंश्री पुरस्कारादाखल चार शब्द
ह. भ. प. शंकर महाराज खंदारकर यांच्या श्रीतुकाराम महाराज गाथाभाष्याचे दोन भाग नुकतेच प्रसिद्ध झाले आहेत. त्यातील पहिल्या भागास प्रास्ताविक म्हणून मी चार शब्द लिहिले आहेत. जवळ-जवळ गाथाभाष्याच्या प्रसिद्धीच्या वेळीच डॉ. प्र. न. जोशी यांचा 'सार्थ तुकाराम गाथा' खंड पहिला प्रसिद्ध होत आहे यासाठी पुरस्कार म्हणून चार शब्द मी लिहीत आहे, हे पाहून वाचकास थोडे आश्चर्य वाटण्याचा संभव आहे. म्हणून त्यासंबंधी खुलासा करणे हे माझे पहिले कर्तव्य आहे. शिवाय, हा खुलासा करताना पुरस्काराचाही त्यात भाग सहजच येत असल्याने पुरस्कार म्हणून वेगळे लिहिण्याचे कारणच पडणार नाही! या दोन सार्थ गाथ्यांचा विषय जरी तुकारामबोवांचे अभंग हा एकच असला तरी त्या दोन गाथ्यांचे कर्ते भिन्न आहेत. ह. भ. प. शंकर महाराज हे वऱ्हाडातील उमरेड येथे ज्यांची समाधी आहे त्या श्रीसाधु महाराजांचे वंशज आहेत. अनेक पिढ्यांचे वारकरी आहेत. त्यांनी स्वतः अधिकारी पुरुषा- जवळ वेदान्तशास्त्राचे उत्तम अध्ययन करून त्यावर प्रभुत्व मिळवले आहे. पंढरपुरात अनेक चातुर्मास्य राहून ज्ञानेश्वरी, तुकोबांचा गाथा यावर प्रवचन-कीर्तने केली आहेत. यामुळे त्यांच्या अर्थावर वारकरी संप्रदायाच्या ज्ञानाच्या लाभाचा, शास्त्राध्ययनाचा, उपासनेचा परिणाम होणे स्वाभाविक आहे. त्यांच्या सार्थ गाथ्याचे नाव 'गाथाभाष्य' आहे. डॉ. प्र. न. जोशी यांचे वडील वै. ह. भ. प. खरडीकर शास्त्री हे उत्तम शास्त्री होते व संत- वाङ्मयाचे मोठे व्यासंगी होते. डॉ. प्र. न. जोशी हे त्यांचे चिरंजीव असल्याने संतवाङ्मयाशी त्यांचा परिचय अगदी बालपणापासून झालेला असणे हे अगदी स्वाभाविक आहे. शिवाय त्यांनी स्वतः संतवाङ्मयाचा अभ्यास करून 'मराठी साहित्यातील मधुर भक्ति' या विषयावर प्रबंध लिहून पुणे विश्वविद्यालयाची Ph. D. ची पदवी संपादन केली आहे व तो त्यांचा प्रबंध प्रसिद्धही झाला आहे. पाश्चात्य पद्धतीने त्यांचा अभ्यास झाल्याने ते संतवाङ्मयाकडे संप्रदाय अथवा परंपरा याहून थोड्या स्वतंत्र अशा बुद्धीने पाहू शकतात. या दोन सार्थ गाथ्यांचे कर्ते अशा रीतीने वेगवेगळ्या संस्कारांनी युक्त असल्याने अभंग तुका- रामाचेच, पण त्याकडे पहाण्याचे दोघांचे दृष्टिकोन एकमेकांपासून भिन्न असावेत, हे अगदी स्वाभाविक आहे. ही भिन्नता त्यांच्या प्रयत्नाच्या नामाभिधानावरूनही कळून येणारी आहे. एका प्रयत्नाचे नाव आहे 'गाथा-भाष्य', दुसऱ्याचे नाव आहे 'सार्थ तुकारामगाथा'. तात्पर्य, दोघांचे दृष्टिकोन भिन्न आहेत म्हणूनच दोघांच्या प्रयत्नासही पुरस्कार म्हणून चार शब्द लिहिणे शक्य झाले आहे. तुकारामबोवांच्या अभंगांची भाषा जरी ज्ञानेश्वरीपेक्षा अर्वाचीन असली तरी, ते अभंग सर्वच सहज समजतील असे मात्र नाहीत. उलट प्रत्येक अभंग हा एक स्वतंत्र तुकडा आहे यामुळे एकाच माण- साला सर्व बाजू दिसतील असे नाही व यामुळेच सर्व बाजूंनी पाहून तो पदरात घ्यावा लागतो. त्यांतील काही अभंग तर खूपच कठीण आहेत. यामुळे अशा अभंगावर वेगवेगळ्या अंगाने प्रकाश पडला तर तो हवाच आहे. त्यायोगे अभंगाची उकल होण्यास मदतच होईल.