सार्थ तुकाराम गाथा (मराठी अभंग व भावार्थ)
Sarth Tukaram Gatha with Marathi Abhangas & Commentary
जगद्गुरु संत तुकाराम महाराज / पं. विष्णूबुवा जोग द्वारा
पृष्ठ 470, कुल 611 में से
संदर्भ में पढ़ें४३२ सार्थ तुकारामगाथा
शब्दार्थ व टीपा - ग्वाही-साक्ष, काज-कारण अर्थ - ज्या स्थानी चित्त साक्षी झाले आहे, त्या ठिकाणी लौकिक गोष्टींची काय किंमत ? आपले स्वहित आपणच पाहावे १ अंतर्बाह्य सर्वत्र एकच परमेश्वर भरून राहिलेला आहे, असा जो मनाचा भाव होत असतो, तोच खरा मानाबपास हृदा २ आपल्या मनातील शुद्ध भाव काही कुणाला सांगावा लागत नाही तो दुसऱ्याच्या ठिकाणी आपल्याकडून प्रकट होत असतो ३ भोगणारा मनुष्य असतो त्यास अंतरंगातील गोडीशी कारण असते, बाहेरच्या रंगास तो कधी भुलत नाही ४ तुकाराम महाराज म्हणतात आपल्या मनातील शुद्ध भाव हेच खरे म्हणजे ईश्वरप्राप्तीचे कारण होय अशा शुद्ध भावाने भजणाऱ्या भक्ताचा तो परमेश्वरच भाट होऊन जातो ५
९५२ नव्हती माझे बोल । अवघें करितो विठ्ठल ॥ १ ॥ काहीं न धरावी खंती । हित होईल धरा चित्तीं ॥ २ ॥ खोटी ते अहंता । वाट टाकिली सांगता ॥ ३ ॥ ज्याचे तोचि जाणे । मी मापाडें तुका म्हणे ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - खंती-चिंता, मापाडें-माप टाकणारा अर्थ - मी हे जे बोलत आहे, ते काही माझे नव्हेच, ते सर्व त्या विठ्ठलाकडूनच बोलले जात आहे १ याविषयी तुम्ही कसलीही चिंता करू नये यात तुमचे हितच होईल, हे चित्तात नीट धारण करावे २ अहंकाराची खोटी वाट जी असते, ती सांगितल्याबरोबर टाकून द्यावी ३ तुकाराम महाराज म्हणतात, मजकडून बोलविणारा जो विठ्ठल तो खरे काय तो जाणतो, मी केवळ माप टाकणारा मापाडी आहे ४
९५३ वासनेच्या मुखीं अदळोनि भीतें । निर्वाहापुरतें कारण ते ॥ १ ॥ या नांवे अंतरा आला नारायण । चित्तसमाधान खूण त्याची ॥ २ ॥ सर्वकाळ हाचि करणे विचार । विवेकीं सादर आत्मत्वाचे ॥ ३ ॥ तुका म्हणे जो जो भजनासी वळे । अंग तो तो कळे सन्निधता ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - भीतें-भिऊन, कारण-कार्य अर्थ - नाना वासनांना भिऊन, त्याची भीती बाळगून, त्याच्या तोंडात काही देऊन आपण जरूरीपुरतेच कार्य करावे १ चित्तात समाधान असणे हीच एक खूण मनात नारायणाचा निवास झाल्याची आहे २ आत्म- तत्त्वाचा विवेक मनात निरंतर करून, नेहमी हाच एक विचार करीत असावे ३ तुकाराम महाराज म्हणतात आपण ज्या ज्या प्रमाणात भजनाकडे वळू, त्या त्या प्रमाणात आपल्या अंगाअंगातून ईश्वराची जवळीक अनुभवास येईल ४
९५४ चिंतने अंचित राहिलो निश्चळ । तेचि किती काळ वाढवाये ॥ १ ॥ अबोल्याचा काळ आता ऐशापरी । वचनाची उरी उरली नाहीं ॥ २ ॥ करू आला तो तो केला उपलाहो । उरोच संदेहो दिला नाहीं ॥ ३ ॥ तुका म्हणे मोह परतेचि ना मार्गे । म्हणउनि त्यागें त्याग जाला ॥ ४ ॥ शब्दार्थ व टीपा - अंचित-निश्चिंत, चिंतारहित, उरी-उणीव, बाकी अर्थ - या भगवंताचे चिंतन एकसारखे केल्याने मी चिंतारहित झालो आहे आता हे चिंतन तरी किती काळपर्यंत वाढवावे ? १ आता न बोलण्याचीच वेळ आलेली दिसते काही बोल बोलावेत अशी बाकी आता राहिली आहे असे नाही २ ईश्वरप्राप्तीसाठी जो जो उपाय करावयास हवा, तो तो मी त्वरित केला असून मी माझ्या मनात कुठलाही संशय उरू दिलेला नाही ३ तुकाराम महाराज म्हणतात तरीसुद्धा माझ्या मनातील लौकिक गोष्टी विषयांचा मोह काही संपतच नाही म्हणूनच मी सर्व प्रपंचाचाच त्याग करावा या मार्गास येण्याचे निश्चित केले ४