भारतकोश
संग्रह पर लौटें

छत्रपति शिवाजी महाराज चरित्र (स्वराज्य स्थापना एवं मराठा इतिहास)

Life & History of Chhatrapati Shivaji Maharaj

के. ए. केळूसकर / शास्त्रीय अनुवाद द्वारा

DevanagariHindipublished127 पृष्ठ

मराठ्यांनी वर्चस्वाखाली आणले आणि तेथून जंजिऱ्यावर हल्ला करण्याची तयारी केली. ऑक्टोबर १६६९ मध्ये मराठ्यांनी सिद्दींची रसद तोडून अक्षरशः कोंडी केली. सिद्दीच्या सैनिकांची उपासमार सुरू झाली. तरीपण सिद्दींनी माघार घेतली नाही उलट मुघलांकडून शिवाजीवर दडपण आणण्याचे प्रयत्न केले. मध्येच सिद्दी प्रमुखाने एक शक्कल लढविली. मुंबईकर इंग्रजांनी दंडाराजपूरी विकत घ्यावी म्हणून त्याने निकराचे प्रयत्न केले. पण शिवाजीशी वैर करण्याची अजिबात इच्छा नसल्याने इंग्रजांनी सिद्दी प्रमुखांच्या या प्रस्तावास मान्यता दिली नाही. मुघल आणि आदिलशहा या दोघांकडूनही सिद्दींना मदत मिळेनासी झाली. अशाप्रकारे सर्व बाजूंनी कोंडी झाल्यानंतर सिद्दी प्रमुख फतेखान याने जंजिरा किल्ला शिवाजीच्या ताब्यात देण्याचा निश्चय केला. त्याने तहाची बोलणी सुरू केली. जंजिरा किल्ल्याच्या मोबदल्यात मोठी जहागिरी देण्याचे शिवाजीने आमिष दाखविले. परंतु जंजिऱ्यातच अंतर्गत वाद निर्माण होऊन फतेखानाविरुद्ध बंड झाले. फतेखान शिवाजीबरोबर तह करीत आहे ही कल्पना तीन प्रमुख सिद्दी सरदारांना अजिबात मान्य नव्हती. हे तीन सरदार म्हणजे सिद्दी संबूळ, सिद्दी कासीम आणि सिद्दी खैरियात. या तिन्ही सरदारांनी फतेखानाला विरोध तर केलाच, पण त्याला कैद करून जंजिऱ्याची सर्व सत्ता आपल्या हाती घेतली. सिद्दी संबूळ हा जंजिऱ्याचा प्रमुख झाला. मुघल सरदार औरंगजेबानेही त्याला तातडीने मान्यता दिली आणि शिवाजी विरुद्ध मदत करण्याचे आश्वासन दिले. जंजिऱ्याची पूर्ण सत्ता हाती आल्यावर आक्रमक धोरण स्वीकारून दंडाराजपूरी मराठ्यांकडून परत घेण्याचा सिद्दी संबूळने निश्चय केला. फेब्रुवारी १६७१ मध्ये दंडाराजपुरी येथे होळीचा उत्सव चालू होता. या उत्सवामध्ये मराठे दंग होते. ही संधी साधून सिद्दी संबूळ याने दंडाराजपुरीवर हल्ला करण्याचे ठरविले. सिद्दी खैरियत जमिनीच्या मार्गाने तर सिद्दी कासीम समुद्रमार्गाने दंडाराजपुरी किल्ल्याजवळ पोहचले. मराठे बेसावध असताना त्यांनी अचानकपणे हल्ला केला. मराठ्यांनी आपला बचाव करण्याचा शर्थीने प्रयत्न केला पण त्यांना अपयश आले. शेवटी दंडाराजपुरी सिद्दींनी ताब्यात घेतली. दंडाराजपुरी सिद्दींकडे गेल्यामुळे जंजिऱ्यावर हल्ला करण्याची कल्पना काही काळ शिवाजीला सोडून द्यावी लागली. सिद्दींनी दंडाराजपुरी घेतल्यावर औरंगजेबाने सढळ हाताने सिद्दींना मदत सुरू केली. त्यांचे आरमारी सामर्थ्य वाढावे म्हणून ३६ जहाजे दिली. या सुमारास मराठ्यांचेही आरमारी सामर्थ्य वाढू लागले. सिद्दी संबूळने मराठ्यांच्या आरमारावर हल्ले सुरू केले. त्यातून ९४ छत्रपती शिवाजी महाराज

सिद्दी व मराठे यांच्यामध्ये आरमारी लढाया सुरू झाल्या. विशेष म्हणजे इंग्रजांनी शिवाजीविरुद्ध सिद्दींना मदत सुरू केली. मार्च १६७४ मध्ये सिद्दी संबूळने सातवली नदीत असलेल्या मराठ्यांच्या आरमारावर जोरदार हल्ला केला. त्यावेळी दौलतखान हा मराठ्यांचा आरमारप्रमुख होता. त्याने मोठा पराक्रम गाजवून सिद्दींचा हल्ला परतावून लावला. स्वतः दौलतखान व सिद्दी संबूळ दोघेही जखमी झाले. मराठ्यांनी आपल्या आरमाराचा बचाव केला. सिद्दी विरोधी लढा देण्यात आपले लोक कमी पडणार नाही हे ओळखून १६७५ मध्ये शिवाजीने जंजिऱ्यावर हल्ला करण्याची पुन्हा तयारी केली. ५७ जहाजांचे जंगी आरमार घेऊन शिवाजीने जंजिरा किल्ल्याला वेढा घातला. परंतु किल्ल्यावरून तोफांचा जबरदस्त मारा करून आणि समुद्रातून लढाऊ जहाजांच्या सहाय्याने हल्ला करून सिद्दी संबूळने शिवाजीचा वेढा मोडून काढला. जंजिरा जिंकणे हे शिवाजीचे एक स्वप्न होते. पण ते साकार होण्याची चिन्हे दिसेनात. पुढील वर्षी म्हणजे १६७६ मध्ये शिवाजीने मोरोपंत पिंगळे यांना १०,००० फौज घेऊन जंजिरा जिंकण्यासाठी पाठविले. किल्ल्याला वेढा देऊन मोरोपंतांनी तोफांचा भडीमार सुरू केला. या प्रसंगी लाय पाटील नावाचा एका सामान्य मराठ्याने रात्रीतून किल्ल्याचा तट चढून जाण्यासाठी शिड्या लावण्याची करामत केली. परंतु ऐनवेळी ही योजना फसली. मराठे तटापर्यंत चढू शकले नाहीत. मुघलांकडून ऐनवेळी सिद्दीना कुमक मिळाली आणि मोरोपंतांना माघार घ्यावी लागली. त्यानंतरही दौलतखानाला पाठवून जंजिरा जिंकण्याचा शिवाजीने प्रयत्न केला. परंतु हा प्रयत्नही अयशस्वी ठरला. शेवटी शिवाजीचे हे स्वप्न अपूरेच राहिले. खांदेरी-उंदेरी १६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने शिवाजीकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्याने सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उद्भवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजीने सुरू केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९५

घेऊन शिवाजीला विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलतखान याने २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखानाला माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला. पोर्तुगीज आणि शिवाजी पोर्तुगिजांनी गोव्यामध्ये आपली सत्ता प्रस्थापित केली. शिवाय कोकणातील वसई हे मोक्याचे केंद्र ही त्यांच्या ताब्यात होते. आधुनिक सुसज्ज आरमार पोर्तुगिजांकडे असल्यामुळे पश्चिम किनाऱ्यांवर त्यांचे वर्चस्व होते. मुघलांनी पोर्तुगिजांच्या समुद्र वर्चस्वाला अप्रत्यक्षपणे मान्यता दिली होती. शिवाजीने आपले आरमार उभारण्यासाठी प्रारंभी पोतुगिजांचीच मदत घेतली होती. परंतु जेव्हा शिवाजीचे आरमार तुल्यबळ होऊ लागले, तेव्हा पोर्तुगिजांना शिवाजीच्या हेतूविषयी शंका वाटू लागली. आपले लहानसे राज्य सुरक्षित राखण्यासाठी एतद्देशीय राज्यकर्त्यांशी सलोख्याचे संबंध ठेवण्याचे पोर्तुगिजांचे धोरण होते. त्यामुळे कधी कधी त्यांना दुटप्पी वर्तन करावे लागे. मुघल आणि आदिलशहा यांच्याशी सलोख्याचे संबंध असताना पोर्तुगिजांनी शिवाजीबरोबरही वरकरणी मित्रत्वाचे संबंध जोडले होते. परंतु शिवजीच्या शत्रूंना आपल्या प्रदेशात आश्रय देऊन त्यांना मराठ्याच्या विरुद्ध चिथावणे शिवाजीविरुद्ध अप्रत्यक्षपणे सिद्दींना मदत करणे,त्यांना शस्त्रात्रे पुरविणे यासारख्या कारवाया पोर्तुगीज करीत असत. ज्यावेळी शिवाजीने दंडाराजपुरीस वेढा घातला होता, त्यावेळी पोर्तुगिजांनी धान्य आणि दारूगोळा यांची मदत सिद्दींना केली. पोर्तुगिजांच्या या दुटप्पी धोरणाचा शिवाजीला चांगलाच अनुभव आलेला होता. मुळातच विदेशी व्यापाऱ्याविषयी शिवाजीचे मत प्रतिकूल होते. संधी येताच हे विदेशी व्यापारी ताब्यात आलेल्या प्रदेशावर घट्ट पाय रोवून बसतील आणि पुढे कोणत्याही परिस्थितीत हाती आलेले ठाणे सोडणार नाही अशी शिवाजीची धारणा होती. त्यामुळे पोर्तुगिजांवर शिवाजीचा अजिबात विश्वास नव्हता तरीपण प्रसंगी पोर्तुगीजांना चुचकारून ९६ छत्रपती शिवाजी महाराज

त्यांची मदत घेण्याचे राजकारणही शिवाजीला करावे लागत असे आणि म्हणून त्याने पोर्तुगीजांशी उघड शत्रुत्व कधीच स्वीकारले नाही. सुरतेची लूट, स्वराज्यात आणतांना पोर्तुगिजांनी शिवाजीला अप्रत्यक्ष मदत केली. १६६६ मध्ये जेव्हा शिवाजी आग्याहून औरंगजेबाच्या कैदेतून सुटून आला तेव्हा गोव्याच्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने शिवाजीची तुलना अलेक्झांडर आणि सिझर यांच्याबरोबर केली होती आणि शिवाजीचे मनःपूर्वक अभिनंदन केले होते. वरकरणी मैत्रीचा देखावा चालू असतांना शिवाजीच्या विरोधकांना आश्रय देण्याचे धोरणही पोर्तुगिजांनी आंगिकारले होते. लखम सावंत, केशव नाईक, केशव प्रभू इत्यादींना आश्रय देऊन शिवाजीच्या प्रदेशावर हल्ले करण्यास पोर्तुगीज त्यांना उतेजन देत होते. या गोष्टीची शिवाजीला विलक्षण चीड आली होती. शिवाय बारदेश भागातील हिंदूंचे सक्तीने धर्मांतर घडवून आणण्याचा प्रयत्नही पोर्तुगीज करीत होते. त्याचाही शिवाजीला अतिशय राग आलेला होता. म्हणून नोव्हेंबर १६६७ मध्ये शिवाजीने बारदेशवर स्वारी केली. या स्वारीमध्ये मराठ्यांनी बारदेशमधील अनेक गावे लुटली. लखम सावंत, केशव नाईक वगैरे सुरक्षित ठिकाणी पळून गेले. पोर्तुगिजांनी पराभव कबूल करून शिवाजीशी तह केला. या तहाप्रमाणे लखम सावंत आणि केशव नाईक यांना पोर्तुगिजांनी आश्रय देऊ नये असे ठरविण्यात आले आणि त्याप्रमाणे या दोन्ही देसायांना गोव्याबाहेर हाकलून देण्यात आले. एक धाडसी योजना प्रत्यक्ष गोव्यामध्येच उठाव करून पोर्तुगिजांना धडा शिकविण्याचा शिवाजीने निश्चय केला. नोव्हेंबर १६६८ मध्ये सुमारे चार-पाचशे लोक शिवाजीने गोव्यात पाठवून दिले त्यानंतरही आणखी काही लोक पाठविले. ही संख्या बरीच वाढल्यानंतर या लोकांनी अचानकपणे गोव्यात उठाव करावा आणि पोर्तुगिजांची सत्ता उध्वस्त करावी अशी योजना शिवाजीने आखली होती. परंतु शिवाजीच्या या योजनेचा सुगावा गोव्याच्या व्हाइसरॉयला लागला. त्याने बारकाईने तपास शिवाजीचे लोक शोधून काढले. त्यानंतर शिवाजीच्या वकीलाला भर दरबारात बोलावून त्याची नालस्ती केली आणि त्याला हाकलून दिले. शिवाजीच्या सर्व लोकांनाही गोव्याबाहेर काढून दिले. अशाप्रकारे ही धाडसी योजना फसली. त्यानंतरही प्रत्यक्ष गोव्यावर स्वारी करण्याचा शिवाजीचा मानस होता. परंतु मुघलांबरोबर संघर्ष चालू असल्यामुळे त्याने सबुरीचे धोरण स्वीकारले आणि फेब्रुवारी १६७० मध्ये पोर्तुगिजांशी सलोख्याचा तह केला. सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९७

फेब्रुवारी १६७० मध्ये सलोख्याचा तह झाल्यानंतर काही काळ पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात कोणताही तणाव नव्हता पण १६७४ मध्ये एका विशिष्ट घटनेमुळे पोर्तुगीज आणि मराठे यांच्यात तणाव निर्माण झाला. १६७४ मध्ये शिवाजीने रामनगरच्या कोळी राजावर स्वारी करून त्याचे राज्य आपल्या स्वराज्यात सामील करून घेतले. हा रामनगरचा कोळी राजा दमण भागात पोर्तुगिजांकडून चौथाई घेत होता. तो हक्क आपल्याला मिळावा म्हणून पोर्तुगिजांकडून शिवाजीने मागणी केली. नाईलाजाने पोतुगिजांनी हा अधिकार मान्य केला. पण १६६९ मध्ये रामनगरच्या राजाने आपला गेलेला प्रदेश मराठ्यांकडून जिंकून घेतला. तेव्हा पोर्तुगीजांनी दमण मधील चौथाईचे हक्क रामनगरच्या राजाला दिले. तेव्हापासून शिवाजी आणि पोर्तुगीज यांच्यामध्ये पुन्हा तणाव निर्माण झाला. हा तणाव पुन्हा संपलाच नाही. शिवाजीची भिती पोर्तुगिजांना शेवटपर्यंत वाटत होती. शिवाजीचा मृत्यू झाल्यावर पोर्तुगीज व्हाइसरॉयने लिहून ठेवले की, 'हे राज्य आता काळजीतून मुक्त झाले. युद्धापेक्षा शांततेच्या प्रसंगी शिवाजी अधिक भीतीदायक होता.' वाक्यावरून पोर्तुगीज शिवाजीची दहशत बाळगून कसे होते याची चांगली कल्पना येते. शिवाजी आणि इंग्रज पाश्चात्य वखारवाल्यांतही इंग्रज वखारवाले अत्यंत धूर्त आणि एतद्देशीय राजकारणाविषयी सावध होते. १७व्या शतकाच्या प्रारंभी इंग्लंडमधील ईस्ट इंडिया कंपनी या व्यापारी कंपनीने भारताबरोबर व्यापारी व्यवहार करण्यासाठी मुघल आणि दक्षिणेतील राज्यकर्त्यांकडून परवाने मिळविले. या इंग्रज कंपनीने भारताच्या पश्चिम आणि पूर्व या दोन्ही किनाऱ्यांवर वखारी स्थापन केल्या त्यापैकी सुरतेची वखार चांगलीच भरभराटीस आली होती. कलकत्ता आणि मद्रास या ठिकाणी कंपनीच्या व्यापारी वखारी होत्या. कंपनीचे भारतातील अधिकारी कंपनीच्या संचालकाबरोबर व्यापाराच्या संदर्भात, आर्थिक प्रश्नाच्या संदर्भात किंवा कंपनीच्या प्रशासनाच्या संदर्भात पत्रव्यवहार करीत असत. हा सर्व पत्रव्यवहार उपलब्ध असून तो फॅक्टरी रेकॉर्ड या नावाने प्रसिद्ध आहे. या पत्रव्यवहारामध्ये भारतातील स्थानिक राजकारणाविषयी,तसेच इतर पाश्चात्य वखारीच्या हालचालींविषयी, काही ठिकाणी माहिती आलेली आढळते. त्यादृष्टीने फॅक्टरी रेकॉर्ड भारताच्या मध्ययुगीन इतिहासाचे एक विश्वसनीय साधन मानले जाते. शिवाजी महाराजांचा उदय झाल्यानंतर, विशेषतः विजापूरच्या मातब्बर सरदार अफजलखान याचा महाराजांनी वध केल्यानंतर कंपनीच्या पत्रव्यवहारामधून ९८ छत्रपती शिवाजी महाराज

महाराजांसंबंधी वारंवार उल्लेख येऊ लागले. विशेष म्हणजे शिवाजी महाराजांनी कोकणचा काही भाग जिंकून स्वराज्यात समाविष्ट केल्यानंतर इंग्रज वखारवाल्यांशी त्यांचे प्रत्यक्ष संबंध येऊ लागले. इंग्रजांशी पहिला संघर्ष अफजलखानाच्या वधापूर्वी त्याच्या मालकीची तीन जहाजे दाभोळ बंदरात माल घेऊन आलेली होती. शिवाजीने जेव्हा दाभोळ बंदर जिंकून घेतले तेव्हा खानाचा मुलगा फाजलखान याच्या आदेशाप्रमाणे ती जहाजे राजापूरकडे गेली. राजापूरला इंग्रजांची वखार होती. राजापूर सुभ्यावर आदिलशाहीतर्फे अब्दुल करीम हा सुभेदार होता. जहाजावरील माल उतरून घेण्यासाठी फाजलखानाने सुभेदारास लिहिले. परंतु दरम्यान बंदरात आलेली ही तीन जहाजे इंग्रजांनी ताब्यात घेतली. कारण अब्दुल करीमने इंग्रजांकडून एक कर्ज काढले होते ते वसूल करण्यासाठी खानाच्या एका जहाजावरील माल इंग्रजांनी उतरून घेतला. १० नोव्हेंबर १६५९ रोजी अफजलखानाचा वध झाला. त्यानंतर मराठ्यांचे सैन्य थेट पश्चिम किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहचले. दौरोजी नावाच्या मराठा अधिकाऱ्याने जानेवारी १६६०मध्ये राजापूरवर हल्ला केला आणि खानाच्या जहाजांची मागणी केली. परंतु इंग्रजांना जहाजे देण्याची टाळाटाळ तर केलीच पण जहाजावरील सुरक्षा सैनिकांना मराठ्यांविरुद्ध लढा देण्यास चिथावले. इंग्रजांचे हे वर्तन मराठ्यांना अजिबात आवडले नाही. त्यांनी गिफर्ड नावाच्या अधिकाऱ्यास आणि त्याचा हस्तक बाबाजी यास कैद केले. पुढे बाबाजीस सोडून दिले. परंतु गिफर्ड मात्र जवळजवळ एक महिना मराठ्यांच्या कैदेत होता. हे वखारवाले धूर्त असून बेमानीने वागतात याचा अनुभव पहिल्या संघर्षात मराठ्यांना आला. रेव्हिंग्टनचा आगाऊपणा १६६० च्या पूर्वार्धात शिवाजी महाराज पन्हाळ्याचा वेढ्यात अडकले होते. सिद्दी जौहरने पन्हाळ्याला जेव्हा वेढा दिला, तेव्हा विजापूर दरबाराने राजापूरच्या इंग्रज वखारवाल्यांना जौहर यास दारूगोळा पुरविण्यासाठी विनंती केली होती तेव्हा वखारीचा अधिकारी रेव्हिंग्टन हा स्वतः तोफा आणि दारूगोळा घेऊन जौहरच्या मदतीसाठी पन्हाळापर्यंत आला होता. स्वतः वेढ्यामध्ये सामील होऊन रेव्हिंग्टनने दारूगोळा कसा उडवावा याचे प्रात्यक्षिक जौहरच्या सैनिकांना दाखविले. या साऱ्या घटनांची माहिती शिवाजी महाराजांना मिळत होती. तेव्हा सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज ९९

नसते उपद्व्याप करणाऱ्या इंग्रजांना संधी येताच चांगला धडा शिकविण्याची खूणगाठ महाराजांनी मनाशी बांधली. पन्हाळ्याहून सुटका झाल्यानंतर १६६१ मध्ये शिवाजी महाराजांनी राजापूरच्या वखारीवर हल्ला केला. रेव्हिंग्टनला कैद केले. गिफर्ड आणि मिचेल हे दोन इंग्रजही रेव्हिंग्टनबरोबर पन्हाळ्यास आले होते. त्या दोघांनाही कैद केले. राजापूरची वखार संपूर्णपणे लुटली. हे इंग्रज कैदी जवळ जवळ दीड- दोन वर्षे शिवाजी महाराजांच्या कैदेत होते. त्यांना वेगवेगळ्या किल्ल्यांवर हलविण्यात येत असे. इंग्रजांनी पुन्हा आपल्या वाटेला जाऊ नये म्हणून शिवाजी महाराजांनी मुद्दाम त्यांना कडक वागणूक दिली. सुरतेवर हल्ला शिवाजी महाराजांनी १६६४ व १६७० या दोन वर्षात अचानकपणे सुरतेवर हल्ला करून यथेच्छ लूट केली. इतर पाश्चात्याप्रमाणे सुरतेला इंग्रजांच्याही वखारी होत्या. पहिल्या लुटीच्या वेळी इंग्रजांनी आपल्या संरक्षणासाठी लढा देण्याचा प्रयत्न केला. परंतु जे निमूटपणे खंडणी देतील त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही असे शिवाजीने अगोदरच जाहीर केले होते त्यामुळे प्रत्यक्ष लढा देण्याची पाळी इंग्रजांना आली नाही. तरीपण वखारवाल्यांच्या पत्रातून इंग्रज अधिकाऱ्यांच्या साहसाची वर्णने आलेली आढळतात. १६७०मध्ये शिवाजी महाराजांनी जेव्हा दुसऱ्यांदा सुरत लुटली तेव्हा मास्टर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने पराक्रमाची शर्थ करुन आपल्या वखारीचे रक्षण केले असे वर्णन समकालीन पत्रांमधून आढळते. परंतु या दुसऱ्या लुटीच्या वेळीसुद्धा जे निमूटपणे खंडणी देतील त्यांना त्रास दिला जाणार नाही असे शिवाजी महाराजांनी जाहीर केले होते. एका उल्लेखावरून तर असे दिसते की इंग्रजांनी अगोदरच शिवाजीशी मित्रत्वाचा तह केला होता. मुंबईकर इंग्रज मुंबई हे लहानसे बेट प्रारंभी पोर्तुगिजांच्या ताब्यात होते. जेव्हा पोर्तुगीज राजकन्येचा इंग्लंडच्या राजपुत्राशी विवाह झाला तेव्हा पोर्तुगिजांनी आंदण म्हणून मुंबई हे बेट इंग्रजांना दिले. या बेटावर साधारणपणे २००० लोकवस्ती होती. त्यामध्ये बहुसंख्य कोळी लोक होते. इंग्लंडच्या राजाने १६६४ मध्ये मुंबई बेट ईस्ट इंडिया कंपनीला भाड्याने दिले. जेव्हा शिवाजी महाराजांनी १६६४ मध्ये सुरतेची लूट केली तेव्हा धूर्त इंग्रजांनी मुंबईला आपले बस्तान बसविण्याचे १०० छत्रपती शिवाजी महाराज

ठरविले. सुरतेहून ईस्ट इंडिया कंपनीचे जे व्यवहार चालत होते ते आता मुंबईहून होऊ लागले. मुंबई हे आपले प्रमुख केंद्र बनविल्यानंतर शिवाजी महाराजांचे आपल्याला संरक्षण मिळेल किंवा महाराजांच्या आश्रयाने आपल्याला निर्धास्तपणे व्यापार करता येईल अशी इंग्रजांची धारणा होती. १६७० मध्ये शिवाजी महाराजांनी आक्रमक धोरण स्वीकारून मुघलांविरुद्ध चौफेर लढा सुरू केला. या लढ्याचा एक भाग म्हणजे मुंबईजवळील कल्याण-भिवंडी हा मोक्याचा प्रदेश महाराजांनी आपल्या वर्चस्वाखाली आणला. या भागात बराच मोठा जंगलमय प्रदेश असून त्या जंगलातून इंग्रज लोक चोरून लाकूडफाटा नेत असत. महाराजांनी या चोरट्या व्यवहारावर बंदी घातली. १६७० मध्येच सुरतेवर आणखी एक स्वारी करून शिवाजी महाराजांनी दुसऱ्यांदा लूट केली. या लुटीचा धसका इंग्रजांनी घेतलेला होता. राजापूरची वखार शिवाजीने लुटल्यापासून इंग्रजांना आपल्या वखारी सुरक्षित राहतील किंवा नाही याची सतत काळजी वाटत होती आणि म्हणूनच शिवाजी महाराजांबरोबर मित्रत्वाचा तह करून आपल्या वखारींना संरक्षण मिळविण्याचे प्रयत्न त्यांनी सुरू केले होते. त्यासाठी मार्च १६७२ मध्ये स्टिफन डस्टिक या मुत्सद्यास इंग्रजांनी शिवाजी महाराजांकडून बोलणी करण्यासाठी पाठविले. फार मोठा नजराणा घेऊन डस्टिक लंडन बोटीने भारतामध्ये आला आणि १६७२ च्या उन्हाळ्यात त्याने शिवाजी महाराजांची भेट घेतली. डस्टिकने राजापूरच्या वखारीची नुकसान भरपाई महाराजांकडे मागितली आणि राजापूरला नव्याने वखार उघडण्याची परवानगी दयावी अशी मागणी त्याने महाराजांकडे केली. परंतु महाराजांनी केवळ ५००० होन नुकसानभरपाई देण्याचे मान्य केले आणि पुन्हा वखार उघडण्याच्या मागणीचा सहानभूतीने विचार करू असे आश्वासन दिले. थोडक्यात डस्टिकची भेट विशेष फलद्रुप झाली नाही. इंग्रजांना शिवाजी महाराजांच्या धोरणाविषयी खात्री वाटेना. स्वतः शिवाजी महाराजांनी व्यापारी व्यवहाराविषयी वाटाघाटी करण्यासाठी आपले वकील इंग्रजांकडे पाठविले. पण त्यातून काही निष्पन्न झाले नाही. एप्रिल १६७३ मध्ये मराठ्यांनी कर्नाटकात घुसून हुबळी येथे असलेली इंग्रजांची वखार लुटली तेव्हा त्या वखारलुटीची नुकसान भरपाई मागण्यासाठी थॉमस निकल्स नावाच्या मुत्सद्यास इंग्रजांनी महाराजांकडे पाठविले. थॉमस निकल्स आणि शिवाजी महाराज शिवाजी महाराजांना खूष करण्यासाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी निकल्सला सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज १०१

अनेक सूचना केल्या होत्या. त्यापैकी एक सूचना म्हणजे सिद्दींना आम्ही मदत करणार नाही असे शिवाजीला आश्वासन द्यायचे. लाकूडफाटा आणि मीठ याच्या व्यापारामध्ये सवलती देण्याची शिवाजीला विनंती करावी. शिवाय शिवाजीला देण्यासाठी मोठा नजराणाही थॉमस निकल्स याचेबरोबर देण्यात आला. १९ मे १६७३ रोजी निकल्स मुंबईहून निघाला आणि २३ मे रोजी रायगडला पोहचला. रायगडचे वर्णन त्याने लिहून ठेवलेले आढळते. 'जर अन्नधान्य व दारूगोळा यांचा सतत पुरवठा झाला तर हा किल्ला साऱ्या जगाविरुद्ध लढू शकेल' असे त्याने लिहून ठेवले आहे. ३ जून १६७३ रोजी शिवाजी महाराज आणि निकल्स यांची भेट झाली. हुबळीच्या लुटीच्या नुकसान भरपाईचा विषय निघताच शिवाजी महाराजांनी सांगितले की 'ही लूट नेमकी कोणी केली हे आम्हाला माहित नाही. त्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न उरत नाही.' लाकूडफाटा व मीठ यांच्या व्यापारात सवलती देण्याचे महाराजांनी मान्य केले. थोडक्यात थॉमस निकल्सच्या भेटीतूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही. निकल्स परत गेल्यावर शिवाजीने भिमाजी पंडित नावाचा आपला वकील मुंबईकर इंग्रजांकडे पाठविला. इंग्रजांशी बोलणी करून परत येतांना नारायण शेणवी नावाच्या इंग्रजांच्या हस्तकाला घेऊन तो रायगडला परतला. या वाटाघाटीतून १०,००० होन नुकसानभरपाई इंग्रजांना देण्याचे शिवाजी महाराजांनी मान्य केले. त्यामुळे इंग्रज व शिवाजी यांच्यातील तणावाचे संबंध संपले. हेन्री ऑक्झिंडेन १६७४ मध्ये शिवाजी महाराजांनी राज्यभिषेक करून घेण्याचे ठरविले.तेव्हा या प्रसंगी मोठा नजराणा घेऊन इंग्रज प्रतिनिधी हेन्री ऑक्झिंडेन रायगडावर आला. राज्यभिषेक झाल्यावर शिवाजीशी तह करून आणखी काही सवलती मिळवाव्यात असा इंग्रजांचा हेतू होता. हेन्री ऑक्झिंडेनने आपल्या रोजनिशीत राज्यभिषेकाचे तपशीलवार वर्णन लिहून ठेवले आहे. राज्यभिषेक सोहळा झाल्यावर हेन्री ऑक्झिंडेन महाराजांना भेटला. राजापूरला पुन्हा वखार उघडण्याची परवानगी त्याने महाराजांकडून मिळवली. त्याचप्रमाणे व्यापारामध्येही काही सवलती मिळविल्या. अशाप्रकारे हेन्री ऑक्झिंडेन शिष्टाई बऱ्याच प्रमाणात सफल झाली.त्या शिष्टाईनंतर १६७५ मध्ये इंग्रजांनी राजापूरला नव्याने वखार उघडली. त्यानंतर शिवाजी महाराज स्वतः राजापूरला गेले असतांना तेथील अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले आणि दोनशे होन नजराणा दिला. १०२ छत्रपती शिवाजी महाराज

धरणगावची लूट हेनरी ऑक्सिंडेन शिवाजी महाराजांना भेटल्यापासून काही दिवस इंग्रज आणि शिवाजी यांचे संबंध मित्रत्वाचे राहिले. परंतु हा सलोखा फार काळ टिकू शकला नाही. १६७४ च्या डिसेंबर महिन्यात मुघलांच्या वर्चस्वाखाली असलेल्या खानदेश सुभ्यात मराठ्यांनी आक्रमण केले आणि हे आक्रमण चालू असतांना धरणगाव येथील इंग्रजांची वखार मराठ्यांनी लुटली. त्यावेळी सॅम्युअल ऑस्टिन हा धरणगावच्या वखारीचा प्रमुख होता. तो वखारलुटीनंतर मुंबईला गेला. तेथील अधिकाऱ्यांशी विचार विनिमय करून नुकसान भरपाई मागण्यासाठी सप्टेंबर १६७५ मध्ये तो रायगडावर आला. प्रत्यक्ष भेटीमध्ये वखारीच्या लुटीबद्दल आपणास काहीच माहिती नाही म्हणून शिवाजी महाराजांनी नुकसान भरपाई देणे अमान्य केले. निदान यापुढे तरी इंग्रजांच्या वखारींना संरक्षण मिळावे म्हणून ऑस्टिनने शिवाजीकडे याचना केली. नुकसान भरपाईचे बाबतीत शिवाजी महाराजांनी ताठर धोरण स्वीकारलेले आढळते. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे आधुनिक तोफा आणि बंदुका महाराजांना इंग्रजांकडून हव्या होत्या. परंतु त्याबाबत इंग्रजांनी नेहमीच टाळाटाळ केली. तेव्हा इंग्रज वरकरणी फक्त गोड वागतात याची शिवाजी महाराजांना खात्री पटली होती. शिवाय आपले कट्टर शत्रू सिद्दी यांना इंग्रज मदत करीत होते याचा अनुभव महाराजांना आलेला होता. सिद्दींच्या गलबतांना मुंबईकर इंग्रज आश्रय देतात हे महाराजांना माहिती होते, म्हणून इंग्रजांशी तह करतांना कोणत्याही मोठ्या सवलती देण्याचे शिवाजी महाराजांनी टाळले. जेव्हा दंडाराजपुरीवर मराठ्यांनी हल्ले केले तेव्हा सिद्दींना इंग्रजांनी आश्रय दिला. त्यामुळे शिवाजी महाराज इंग्रजांविषयी सावध झाले. सिद्दींच्या अगोदर इंग्रजांचाच बंदोबस्त केला पाहिजे असा निश्चय शिवाजी महाराजांनी केला. त्यादृष्टीने मुंबई बंदराजवळ असलेल्या खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. खांदेरीची लढाई खांदेरीला शिवाजी महाराजांच्या आदेशाप्रमाणे मायनाक भंडारी यांच्या देखरेखीखाली तटबंदी बांधण्याचे काम मराठ्यांनी सुरू केले. खांदेरीला जर मराठ्यांनी तटबंदी बांधली तर मुंबईचे आपले केंद्र धोक्यामध्ये येईल असे इंग्रजांना वाटू लागले. तेव्हा बांधकामाला साहित्य मिळू नये म्हणून इंग्रजांनी मराठ्यांची रसद तोडण्याचा प्रयत्न केला. त्यातून मराठे व इंग्रज यांच्यात तीव्र संघर्ष सुरू झाला. इंग्रजांनी सप्टेंबर १६७५ मध्ये खांदेरी बेटावर तोफांचा सिद्दी, पोर्तुगीज आणि इंग्रज १०३

भडीमार सुरू केला. शिवाजी महाराजांचा आरमारप्रमुख दौलतखान शीघ्र गतीने इंग्रजांच्या प्रतिकारासाठी खांदेरीपर्यंत आला. मायनाक भंडाऱ्याने इंग्रजांची काही गलबते पकडली. तसेच काही इंग्रजांना कैद केले. तेव्हा मुंबईहून केग्विन याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचा प्रतिकार करण्यासाठी इंग्रजांचे सुसज्ज आरमार निघाले. या आरमारामध्ये एक मोठे जहाज आणि सात गलबते होती. दौलतखानाजवळ वीस गुराबांचे आरमार होते. इंग्रजांच्या आरमारी हालचाली होण्यापूर्वीच दौलतखानाने आरमारी हल्ले सुरू केले. इंग्रजांची गलबते निकामी केली. रिव्हेंज, फ्रिगेज हे मोठे जहाज इंग्रजांजवळ असल्यामुळे त्यांना आपण मराठ्यांचा सहज पराभव करू अशी घमेंड होती. मुंबईहून निघण्यापूर्वी आपण नक्की विजयी होणार अशी फुशारकी केग्विनने मारली होती. परंतु प्रत्यक्षात केग्विनचे आरमार टक्कर देऊ शकले नाही. नोव्हेंबर १६७९ मध्ये इंग्रज आणि मराठ्यांमध्ये मोठे आरमारी युद्ध झाले. स्वतः केग्विनने तक्रार केली होती की, मराठ्यांची गलबते चलाख असल्यामुळे आपली लढाऊ गलबते कुचकामी ठरली. यासुमारास मराठ्यांची आरमारी शक्ती नष्ट करण्याच्या इराद्याने सिद्दीनी स्वतंत्रपणे मराठ्यांविरुद्ध आरमारी चढाई केली. परंतु इंग्रज आणि सिद्दी या दोघांच्याही आरमाराचा मराठ्यांनी अक्षरशः धुव्वा उडविला. शेवटी इंग्रजांनी माघार घेतली. खांदेरी उंदेरी यापुढे शिवाजीच्याच ताब्यात राहणार याची इंग्रजांना खात्री पटली. खांदेरीचे युद्ध संपले. पण मुंबईकर इंग्रजांना खांदेरी मराठ्यांच्या ताब्यात असल्यामुळे नंतरही बरीच वर्षे भीती वाटत होती. हे १६८२ च्या एका पत्रावरून स्पष्ट होते. इंग्रजांप्रमाणे डच आणि फ्रेंच यांच्याशीही शिवाजी महाराजांचा संबंध आला. डचांनी प्रथमपासूनच शिवाजीबरोबर मैत्री राखण्यात यश मिळविले. फ्रेंचांचे मुख्य केंद्र पाँडेचेरीला असताना शिवाजी महाराजांचा त्यांच्याशी फार संबंध आला नाही. शिवाजी महाराजांनी दक्षिणेची स्वारी काढली त्यावेळी पाँडेचेरीचे फ्रेंच अत्यंत सावध होते. तेथील प्रमुख अधिकारी मार्टीन याने शिवाजी महाराजांच्या दक्षिण स्वारीची माहिती लिहून ठेवलेली आढळते. लांब पल्ल्यांच्या तोफा फ्रेंचांकडून मिळविण्याचा प्रयत्न शिवाजी महाराजांनी केला. त्याचप्रमाणे किल्ल्यांची डागडुजी करण्यासाठी आणि भक्कम तटबंदी बांधण्यासाठी महाराजांनी फ्रेंचांकडे वास्तुविशारदांची मागणी केली. परंतु या दोन्ही मागण्यांबाबत शिवाजीला यश आले नाही. पाश्चात्य वखारवाले स्थानिक राज्यकर्त्यांशी पुरेसे संरक्षण मिळावे म्हणून सलोख्याचा संबंध ठेवण्याचा प्रयत्न करीत असत. पण त्याचबरोबर आपल्या तंत्रज्ञानाचा किंवा शस्त्रास्त्रांचा स्थानिक राज्यकर्त्यांबाबत १०४ छत्रपती शिवाजी महाराज

विशेषत्वाने उपयोग होणार नाही याची खबरदारी घेत असत. पाश्चात्यांचे हे दूरदृष्टीचे राजकारण शिवाजी महाराजांना मात्र उमगले होते हे त्यांच्या द्रष्टेपणाचे प्रतिक मानता येईल. □□□ सिद्धी, पोर्तुगीज आणि इंग्रज १०५

१३. शिवरायाच्या कार्याचे स्वरूप इ. स. १६८० च्या प्रारंभी शिवाजी महाराजांनी आपल्या बहुतेक शत्रूंना नामोहरम केल्याचे आढळून येते. फेब्रुवारीमध्ये मुघलांचा पराभव करण्यामध्ये महाराजांना यश आले. इंग्रज लोक सिद्दींना मदत करत आहेत हे लक्षात आल्यावर महाराजांनी इंग्रजांनाही धडा शिकविला. आपला निभाव लागणार नाही हे ओळखून इंग्रजांनी जानेवारी १६८० मध्ये शिवाजी महाराजांशी तह केला व यापुढे सिद्दींना मदत करणार नाही असे आश्वासन दिले. सिद्दी कासीम मात्र मुघलांच्या मदतीमुळे समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत होता. खांदेरीवर शिवाजी महाराज तटबंदी बांधत आहेत हे पाहून तेथून जवळच असलेले उंदेरी हे बेट सिद्दी कासीमने जिंकून घेतले. त्यामुळे सिद्दी आणि मराठे यांच्यामधील संघर्ष १६८०च्या उन्हाळ्यातही चालू राहिला. एक सिद्दी जर सोडला तर महाराजांचे बाकीचे सर्व शत्रू एकतर नामोहरम झाले होते किंवा महाराजांशी तह करून सुरक्षित राहण्याचा प्रयत्न करीत होते. अशा प्रकारे आपल्या सर्व शत्रूंचा बंदोबस्त झाल्यावर फेब्रुवारी १६८० मध्ये शिवाजी महाराज रायगडावर परतले. ७ मार्च १६८० रोजी राजारामाचा उपनयनविधी करण्यात आला. त्यानंतर १५ मार्च रोजी राजारामाचा विवाह प्रतापराव गुजराच्या मुलीबरोबर करण्यात आला. अशाप्रकारे मंगल कार्यामुळे रायगडावर मोठे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अचानकपणे शिवाजी महाराज रक्तातिसाराने आजारी पडले आणि हे दुखणे विकोपास जाऊन चैत्र शुद्ध पौर्णिमा शके १६०२ म्हणजे ३ एप्रिल १६८० रोजी शिवाजी महाराजांचा अकाली मृत्यू झाला. स्वराज्यावर मोठा आघात झाला. रायगडावर शोकसागर उसळला. ऐन उमेदीच्या वयात झालेला महाराजांचा मृत्यू म्हणजे चौफेर विस्ताराची वाटचाल करणाऱ्या स्वराज्यावर मोठा आघात होता. शिवाजी महाराजांचे कार्य शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याचे अलौकिक कार्य शिवाजी महाराजांनी १०६

करून दाखविले. त्यांनी स्थापन केलेल्या राज्याचे मोठे वैशिष्ट्य असे होते की हे राज्य भोसले वंशाचे राज्य असूनही सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेले राज्य होते. लोककल्याणाचा विचार करणारा राज्यकर्ता त्या काळामध्ये जगात इतरत्र झालेला आढळत नाही. म्हणूनच १७व्या शतकातील महान राजा या दृष्टीने शिवाजी महाराजांचेच नाव घ्यावे लागते. रामदास स्वामींनी शिवाजी महाराजांचे व्यक्तीमत्व आपल्या काव्यातून अत्यंत प्रभावीपणे व्यक्त केलेले आढळते. फक्त एकाच ओवीमध्ये महाराज कसे होते ते रामदास स्वामींनी स्पष्ट केले आहे, निश्चयाचा महामेरू । बहुत जनासि आधारू ॥ अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥ शिवाजीचे निकटवर्ती सहकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचे मूल्यमापन करताना असे म्हटले आहे, 'राजा साक्षात केवळ अवतारीच जन्मास येऊन पराक्रम केला. नर्मदेपासून रामेश्वरपर्यंत द्वाही फिरली. देश काबीज केला... नवेच राज्य साधून मराठा पातशाहा सिंहासनाधिश छत्रपति जाहाला. ये जातीचा कोणी मागे जाहाला नाही. पुढे होणार नाही.' रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रामध्ये शिवाजीचे कर्तृत्व सांगताना म्हटले आहे की, 'त्यांनी केवळ नुतन सृष्टीच निर्माण केली' समकालीन हिंदी कवी भूषण महाराजांविषयी लिहितो की, 'साहि के सपूत सिबराज, समसेर तेरी दिल्ली दल दाबि कै। दवाल राखी दुनी मै ॥' शिवाजी महाराजांनी केवळ राज्य स्थापन केले म्हणून ते फार थोर होते असे म्हणता येणार नाही. राज्य स्थापन करून राज्याचा विस्तार केला हे त्यांच्या पराक्रमाचे लक्षण आहे. पण आपल्या राज्यातील रयतेच्या सुखासाठी रात्रंदिवस प्रयत्न करणारा महान पुरुष म्हणून शिवाजी महाराजांची योग्यता मोठी होती. रयतेला लेकराप्रमाणे मानणारा हा राजा आपल्या राज्यातील साधुसंतांना आणि स्त्रियांना काडीचाही उपद्रव लागू नये म्हणून अत्यंत प्रयत्नशील होता. परमुलुखातील स्त्रियांना आणि बालकांना उपद्रव देणाऱ्या आपल्या सैनिकाची गय केली जाणार नाही. असे स्पष्ट आदेश त्यांनी दिलेले होते. 'परमुलुखात बायका पोरं जो धरील त्याची गर्दन मारली जाईल' हे शिवाजीचे ब्रीदवाक्य होते. शिवाजीच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि धार्मिक धोरणाचा आढावा घेतल्यास लोककल्याण हेच त्यांच्या धोरणाचे मूलतत्त्व होते असे दिसून येते. शिवरायांच्या कार्याचे स्वरूप १०७

शिवाजी महाराजांचे कुटुंब शिवाजी महाराजांनी एकंदर ८ विवाह केले. या ८ राण्यांची नावे पुढीलप्रमाणे :- १) सगुणाबाई, २) सईबाई ३) सोयराबाई, ४) पुतळाबाई, ५) लक्ष्मीबाई, ६) सकवारबाई, ७) काशीबाई आणि ८) गुणवंताबाई. महाराजांना २ मुले होती १) संभाजी २) राजाराम. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांच्या ४ राण्या हयात होत्या. संभाजीची आई सईबाई तो केवळ अडीच वर्षांचा असताना मरण पावली. राज्याभिषेक होण्याच्या प्रसंगी पट्टराणी होण्याचा मान सोयराबाईस मिळाला. परंतु युवराज होण्याचा मान संभाजीला मिळाला. त्यातूनच रायगडावर तंटेबखेडे सुरू झाले. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर जवळजवळ १ महिन्याने राणी पुतळाबाई सती गेली. शिवाजी महाराजांना ६ मुली होत्या. या सर्व मुलींचे विवाह नामांकित घराण्यातील पुरुषांशी झाले. परंतु शिवाजी महाराजांचा एकही जावई त्यांच्या स्वराज्यकार्यात सहभागी झालेला आढळत नाही. शिवाजी महाराजांची आई जिजाबाई ही महाराजांच्या राज्याभिषेकापर्यंत म्हणजे जून १६७४ पर्यंत हयात होती. आपल्या मुलाला सिंहासनावर बसल्याचे पाहून त्या माऊलीच्या आनंदाला पारावार राहिला नाही. राज्याभिषेक झाल्यानंतर केवळ १२ दिवसांनी म्हणजे १७ जून १६७४ रोजी जिजाबाईंचा पाचाड येथे राहात्या घरात मृत्यू झाला. स्वराज्याचे प्रशासन सभासद बखरीमध्ये असे म्हटले आहे की, 'आपला अंतकाळ जवळ आल्यावर आपल्या विश्वासू अधिकाऱ्यांना शिवाजी महाराजांनी जवळ बोलाविले आणि स्वराज्याचा कारभार पुढे कसा करावा याचे मार्गदर्शन केले.' आपल्या राज्याचा विस्तार सांगताना महाराजांनी असे स्पष्ट केले की, 'राज्य म्या शिवाजीने चाळीस हजार होनाचा पुणे महाल होता, त्यावरि एक क्रोड होनाचे राज्य पैदा केले.' स्वराज्यामध्ये समाविष्ट असलेल्या सुभ्यांच्या उत्पन्नाची माहिती देणारा एक शिवकालीन जाबता उपलब्ध आहे. त्यामध्ये स्वराज्यातील सुभ्यांचे एकूण उत्पन्न १,३२,६६,६३५ एवढे दर्शविले आहे. स्वराज्यात मोडणारा प्रदेश एकूण १४ सुभ्यांचा होता. शिवाजीच्या स्वराज्याची भौगोलिक मर्यादा स्पष्ट करताना रामचंद्रपंत अमात्यांनी आज्ञापत्रात म्हटले आहे की, 'सालेरी अहिवंतापासून चंजी कावेरी तीरापर्यंत निष्कंटक राज्य संपादन केले.' साधारणपणे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या भौगोलिक सीमा पुढीलप्रमाणे सांगता येतील. उत्तरेकडे बागलाण प्रदेश, दक्षिणेकडे नाशिक व पुणे भागातून सातारा आणि कोल्हापूर १०८ छत्रपती शिवाजी महाराज

भागापर्यंत स्वराज्याची सरहद्द होती. ही सरहद्द सरळ रेषेत थेट कारवारपर्यंत येऊन भिडली होती. त्याशिवाय कर्नाटकातील बेळगाव, कोप्पल, बल्लारी, चित्तुर, अर्कोट, वेलोर आणि जिंजी या भागातील काही प्रदेश स्वराज्यामध्ये मोडत होता. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रशासनव्यवस्था अत्यंत काटेकोर पद्धतीने केलेली होती. राजा हा सर्वश्रेष्ठ असून मुलकी, लष्करी तसेच न्यायविषयक प्रशासनाचे अधिकार राजाच्या हाती केंद्रीत झाले होते. राज्यकारभार सुरळीत चालावा म्हणून शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली होती. राज्याभिषेकसमयी ८ प्रधान नेमून त्यांच्याकडे प्रशासनाची जबाबदारी वाटून देण्यात आली. १. पेशवा किंवा पंतप्रधान : हा सर्वात जबाबदार प्रधान असून मुलकी आणि लष्करी प्रशासनावर नियंत्रण ठेवण्याचे काम त्याच्याकडे सोपविले होते. त्यादृष्टीने राजपत्रावर शिक्का मारण्याचा त्याला अधिकार होता. राजाच्या आदेशाप्रमाणे प्रदेशाची व्यवस्था लावणे, प्रदेशाचे संरक्षण करणे आणि स्वतः युद्धप्रसंगी हजर रहाणे ही अत्यंत महत्त्वाची कामे प्रधानाकडे सोपविली होती. राज्याभिषेकप्रसंगी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पंतप्रधान म्हणून नेमले. २. अमात्य : हा दुसरा महत्त्वाचा प्रधान असून त्याच्याकडे राज्याची अर्थव्यवस्था पहाण्याचे काम सोपविण्यात आले होते. शिवाय युद्धप्रसंगाला त्यालाही रणांगणावर हजर रहावे लागत असे. शिवाजी महाराजांनी प्रथम नारो निळकंठ व नंतर रामचंद्र निळकंठ यांना अमात्यपद बहाल केले होते. ३. सचिव : तिसरा प्रधान म्हणजे सचिव. राजकीय पत्रव्यवहाराची जबाबदारी, तसेच नव्याने जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावण्याचे काम सचिवाकडे होते. त्यालाही युद्धप्रसंगी हजर रहाण्याची जबाबदारी देण्यात आली होती. महाराजांनी अण्णाजी दत्तो यास सचिव म्हणून नेमले होते. ४. मंत्री : चौथा प्रधान म्हणजे मंत्री. राजकारणाविषयी महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार या प्रधानाकडे सोपविण्यात आले होते. महाराजांनी दत्ताजी त्रिंबक याला मंत्री म्हणून नेमले होते. ५. सेनापती : हा लष्कराचा प्रमुख असून राज्य रक्षणाची जबाबदारी त्याच्यावर होती. युद्धप्रसंगी हजर रहाणे हे तर त्याचे आद्यकर्तव्य होते. शिवाजी शिवरायाच्या कार्याचे स्वरूप १०९

६. दक्षिण दिग्विजय, स्वराज्य विस्तार व उपसंहार

महाराजांनी हंबीरराव मोहिते याला सेनापतीपद दिले होते. ६. पंडितराव : या प्रधानाला धर्मविषयक सर्व अधिकार देण्यात आले होते. त्याचप्रमाणे विद्वानांचा सत्कार करणे, अनुष्ठाने करणे, दानधर्माची आखणी करणे इत्यादी कामे त्याच्याकडे सोपविली होती. महाराजांनी रघुनाथ पंडीत याची पंडितराव म्हणून नियुक्ती केली होती. ७. न्यायाधीश : न्यायदानाची जबाबदारी याच्यावर असून निवाडापत्रावर याचे संमतीचिन्ह आवश्यक मानले जात असे. या पदावर निराजी रावजी याची नेमणूक शिवाजी महाराजांनी केली होती. ८. सुमंत : परराज्याशी सामान्य व्यवहार करण्यासाठी या प्रधानाची नियुक्ती करण्यात आली होती. महाराजांनी रामचंद्र त्रिंबक यास सुमंत म्हणून नेमले होते. या सर्व प्रधानांचे वेतन निश्चित करण्यात आले होते. पेशव्यास दरवर्षी १५,००० होन तर अमात्यास दरवर्षी १२,००० होन असे वेतन ठरवण्यात आले होते. इतर प्रधानांना दरवर्षी १०,००० होन असे वेतन निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक प्रधानाला ८ कारकून म्हणजे अधिकारी देण्यात आले होते. १) दिवाण, २) मुजुमदार, ३) फडणीस, ४) सबनीस, ५) कारखानीस, ६) चिटणीस, ७) जामदार व ८) पोतनीस. या ८ अधिकाऱ्यांचे वेतनही निश्चित करण्यात आले होते. शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याचे प्रशासन जास्तीत जास्त निर्दोष आणि स्वच्छ असले पाहिजे म्हणून काही दंडक घालून दिले होते. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी प्रधानांचे आणि अधिकाऱ्यांचे पगार निश्चित केले. त्यांच्या बढतीचे अथवा बडतर्फीचे अधिकार स्वतःकडे राखून ठेवले. दुसरा दंडक म्हणजे कोणत्याही प्रकारचे अधिकार एकाच प्रकारच्या अधिकाऱ्याकडे केंद्रित न करता ते दोन किंवा तीन अधिकाऱ्यांकडे विभागून देण्यात आले होते. त्यामुळे प्रशासनामध्ये एक शिस्त निर्माण झाली होती. आपल्या मर्जीप्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार एक व्यक्तीच्या हातामध्ये ठेवलेला नव्हता. मुलकी व्यवस्थेप्रमाणे लष्करी व्यवस्थेतही महाराजांनी या तत्त्वाचा उपयोग केला होता. मुलकी व्यवस्था स्वराज्यामध्ये एकूण चौदा सुभ्यांचा समावेश होता. त्या सुभ्यांना प्रांत असे म्हटले जाईल. प्रांताचा अधिकारी म्हणजे सुभेदार किंवा देशाधिकारी. ११० छत्रपती शिवाजी महाराज

प्रांताची विभागणी महालात करण्यात आली होती. महालावरील अधिकाऱ्याला हवालदार म्हणत. महालाची विभागणी परगण्यात करण्यात आली होती. परगण्याचे अधिकारी म्हणजे देशमुख आणि देशपांडे. खेडे हा शेवटचा घटक होता. त्याचे अधिकारी म्हणजे पाटील आणि कुलकर्णी. खेड्याच्या अधिकाऱ्यापासून ते प्रांतांच्या अधिकाऱ्यापर्यंत सर्वांची जबाबदारी महसूल वसुलीची होती. त्याशिवाय आपल्या विभागात शांतता व सुव्यवस्था राखणे, किल्ल्यांच्या रक्षणासाठी तत्पर असणे आणि आपआपल्या घटकापुरते न्यायनिवाड्याचे काम करणे इ. कामे संबंधीत प्रधानांच्या आणि राजाच्या आदेशाप्रमाणे करावी लागत असत. सुभेदाराने आपआपल्या प्रांतातील. रयतेची सर्वप्रकारची काळजी घेतली पाहिजे असा शिवाजी महाराजांचा दंडक होता. नवा प्रदेश स्वराज्यात समाविष्ट झाल्यावर त्या प्रदेशातील रयतेची सर्वप्रकारची सोय करावी, त्यांच्या अडीअडचणी सोडवाव्यात अशा आज्ञा सुभेदाराला केलेल्या असत. शिवाजी महाराजांचे प्रशासन कल्याणकारी राज्याच्या स्वरूपाचे होते. त्यांनी वेगवेगळ्या सुभेदारांना लिहिलेली पत्रे प्रसिद्ध झालेली आहेत. या पत्रांमधून रयतेविषयी महाराजांचीं किती तळमळ होती हे स्पष्ट होते. रयतेला काडीचा जरी उपद्रव झाला तरी महाराज तो सहन करणार नाही असा इशारा महाराजांनी प्रभावळीच्या सुभेदाराला लिहिलेल्या एका पत्रामध्ये आढळतो. स्वराज्यात नव्याने समाविष्ट होणाऱ्या प्रदेशाबाबत सभासद लिहितो की, 'नवी रयत येईल त्यास गुरेढोरे द्यावी. बीजासाठी दाणापैका द्यावा.' एका पत्रात महाराजांनी सुभेदारांना म्हटले आहे की, 'ज्याला शेत करावयाची कुवत आहे पण ज्याच्याकडे बैल, नांगर, बी- बियाणे नाही, त्यांना सर्व साहित्य पुरवावे. गरीब शेतकऱ्यांना दिलेले कर्ज त्यांच्या सवडीप्रमाणे वसूल करावे, त्यासाठी कोणतीही बळजबरी करू नये. शिवाजी महाराजांचे हे धोरण पाहिल्यास महाराज हे मध्ययुगीन कल्याणकारी राज्याचे प्रवर्तक होते असे म्हणता येईल. वतनदारी यादव कालापासून महाराष्ट्रात वतनदारांची परंपरा निर्माण झाली होती. इस्लामी राज्यकर्त्यांनी या वतनदारी पद्धतीची जोपासना केली. हे वतनदार राज्यकर्त्यांना खूष करण्यासाठी प्रजेचा छळ करीत असत. बहमनी काळात वतनदारांनी महसूल गोळा करण्यासाठी रयतेवर किती निष्ठूरपणे अत्याचार केले हे तत्कालीन कागदपत्रावरून दिसते. त्याचप्रमाणे संत एकनाथांच्या काव्यामधूनही ते चित्र स्पष्ट होते. शिवाजी महाराजांना रयतेचा छळ करणाऱ्या शिवरायाच्या कार्याचे स्वरूप १११

वतनदारांचा मनस्वी तितकारा होता. वतनदारी पद्धती बंद करावी असा कठोर विचारही शिवाजी महाराजांनी केला होता हे सभासद बखरीतील उल्लेखावरून वाटते. परंतु हा कठोर विचार प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी होत्या. पहिली अडचण म्हणजे वतनदारी पद्धती वंशपरांगत पद्धतीने चालत आली होती. दुसरी अडचण म्हणजे पाटील कुलकर्ण्यापासून देशमुख- देशपांड्यापर्यंत सर्व अधिकारी वतनदार होते. या सर्वांची वतने नष्ट केली तर अराजक निर्माण होईल व हे असंतुष्ट वतनदार शत्रुपक्षाला जाऊन मिळतील अशी कायमची धास्ती वाटत होती. शिवाजीने स्वराज्य स्थापन केल्यापासून अनेक मराठे वतनदार त्याच्याविरुद्ध गेले. काहीजणांना राजे हे किताब असल्यामुळे ते स्वतःला शिवाजीपेक्षा श्रेष्ठ समजत असत. अशा वतनदारांविरुद्ध शिवाजी महाराजांना लढावे लागले. अफझलखानाने जेव्हा महाराजांविरुद्ध स्वारी काढली तेव्हा त्याने मावळ आणि वाई भागातील देशमुखांना शिवाजीविरुद्ध चिथावले. तीच गोष्ट पुढे मिर्झाराजे जयसिंगाने केली. तेव्हा वतन रद्द करण्याचा कठोर निर्णय घेतला तर हे सर्व लोभी वतनदार बंड पुकारतील, आदिलशहा किंवा मुघलांना मिळतील आणि त्यामुळे स्वराज्यकार्यात दुर्धर समस्या निर्माण होतील याची जाणीव शिवाजी महाराजांना होती. म्हणून त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारला. सरसकट सर्व वतने रद्द करण्याऐवजी जे वतनदार पुंड झाले आहे व जे रयतेवर जुलूम करीत आहेत, त्यांना वठणीवर आणण्यासाठी अशा वतनदारांची वतने रद्द करण्याचे धोरण त्यांनी स्वीकारले. समकालीन काही विश्वसनीय पत्रांतून बंडखोर व जुलुमी वतनदारांना शिवाजी महाराजांनी कसे नामोहरम केले याचे उल्लेख सापडतात. वतनदारांनी रयतेला गुलाम समजू नये असे महाराजांचे स्पष्ट मत होते. सभासद लिहितो की, 'मुलखात जमीनदार, देशमुख व देसाई यांचे जप्तीखाली कैदेत रयत नाही. याणी 'साहेबी' करून नागवीन म्हटलियाने त्यांच्या हाती नाही.' आहे ती वतने चालवावीत, परंतु नवी देऊ नये असे महाराजांचे एकूण धोरण होते. अमात्य आपल्या आज्ञापत्रात लिहितात, 'आहे वतन ते चालवून यांची सत्ता असू न द्यावी... नवी इनामे, देऊ नयेत. वतनदारांना स्नेह आणि दंड या दोहोंमध्ये निक्षून ठेवावे.' अमात्यांच्या विवेचनावरून शिवाजी महाराजांच्या धोरणाची पूर्ण कल्पना येते. किल्ल्यांची व्यवस्था अमात्यांनी आज्ञापत्रात 'संपूर्ण राज्याचे सार ते दुर्ग' या एका वाक्यात किल्ल्यांचे महत्व स्पष्ट केले आहे. गड, कोटांच्या सहाय्याने शिवाजी महाराजांनी ११२ छत्रपती शिवाजी महाराज

स्वराज्य स्थापना केली आणि राज्यविस्तार केला. कोणत्याही राज्यकर्त्यापेक्षा महाराजांनी किल्ल्यांना अनन्यसाधारण महत्त्व दिले. शिवकालामध्ये किल्ल्यांचे ३ प्रमुख प्रकार होते. १) गिरिदुर्ग २) स्थलदुर्ग ३) जलदुर्ग. यामध्ये शिवाजी महाराजांनी गिरिदुर्गांचे महत्त्व वाढविले. त्यांच्या बहुतेक राजकीय हालचाली गिरिदुर्गावरूनच झालेल्या आढळतात. आपल्या राजधानीसाठी प्रथम राजगड आणि नंतर रायगड या गिरिदुर्गांचीच निवड महाराजांनी केली होती. स्वराज्याची हद्द समुद्रापर्यंत भिडल्यानंतर जलदुर्गांची उभारणीही महाराजांनी केली. १६६७ मध्ये मालवणजवळ सिंधुदुर्ग हा किल्ला बांधून महाराजांनी आपली सागरी राजधानी येथे केली. स्वराज्यामध्ये एकंदर दोनशेचाळीस किल्ले होते. प्रत्येक किल्ल्यासाठी तीन अधिकारी नेमले जात. हवालदार, सबनीसं आणि कारखानीस. अशा र्या तीन अधिकाऱ्यांकडे किल्ल्यांचा कारभार सोपविलेला असे. हे तिन्ही अधिकारी एकाच दर्जाचे असून कोणताही निर्णय घेताना तिघांचीही संमती आवश्यक मानली जात असे. गडावरच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असत. हे सर्व अधिकारी पगारी होते. किल्ल्याच्या संरक्षणासाठी लढाऊ शिबंदी ठेवली जात असे. याशिवाय किल्ल्याच्या कामासाठी व किल्ल्यावरील लोकांच्या सोयीसाठी सुतार, लोहार, पाथरवट, चांभार, रसायनवैद्य, शस्त्रवैद्य, ज्योतिषी इ. लोक नेमलेले असत. परंतु गरजेपेक्षा अधिक माणसे किंवा बाजारबुणगे किल्ल्यावर ठेवायचे नाहीत अशी शिवाजीची सक्त सूचना होती. आरमार आज्ञापत्रामध्ये अमात्यांनी आरमाराविषयी स्वतंत्र प्रकरण लिहिलेले आहे. ‘ज्याच्याजवळ आरमार त्याचा समुद्र’ अशा मोजक्या शब्दात अमात्यांनी आरमाराचे महत्त्व विशद केले आहे. इ.स. १६५९ मध्ये शिवाजीने आरमाराचा पाया घातला. भिवंडी, कल्याण व पनवेल या ठिकाणी लढाऊ जहाजे बांधली १६६५ मध्ये शिवाजीजवळ ८५ लहान व ३ मोठी गलबते होती. नंतर ५ वर्षात महाराजांनी आरमारी सामर्थ्य एवढे वाढवले की १६७० मध्ये महाराजांच्या आरमारात १६० जहाजे असल्याचा उल्लेख सापडतो. सभासदांच्या माहितीप्रमाणे महाराजांच्या आरमारात ४०० जहाजे होती. दर्यासारंग आणि मायनाक या दोन अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येकी दोनशे जहाजांचे आरमार होते. आरमाराचे सुभे केलेले असून प्रत्येक सुभ्यामध्ये पाच गुराबा व पंधरा गलबते असत. महाराजांचे आरमारी सामर्थ्य एवढे वाढले की, पोर्तुगीजांना, इंग्रजांना आणि सिद्दींना या आरमाराची भीती वाटू लागली होती. ‘समुद्रामध्ये शिवरायाच्या कार्याचे स्वरूप ११३